गर्वाचे घर खाली
कासवपुरीत त्या दिवशी सर्वत्र आनंदी आनंद
दिसत होता. लहानमोठी सारी कासवे अगदी बेहोष झाली होती. त्या साऱ्यांच्या आनंदाचे
कारण पण तसेच होते. साऱ्या कासव जातीची छाती अभिमानाने फुगावी अशी एक गोष्ट एका
कासवाने केली होती. पळण्याच्या शर्यतीत एका सशाचा त्याने पूर्ण पराभव केला होता.
विजेच्या चपळाईने पळणाऱ्या सशाला त्याने जिंकले होते. त्याच्या अभिनंदनासाठी सर्व
जण एकत्र जमले होते.
यशस्वी कासवाच्या गळ्यात कितीतरी हार
पडले. त्याच्यावर अभिनंदनपर भाषणांचा जणू काही पाऊस पडला ! “वाहवा ! शाबास ! आमचे
नाव राखले ! आपल्या जातीचा व कुळाचा उद्धार केला !" असे उद्गार सर्वत्र ऐकू
येऊ लागले. त्या विजयी कासवाला तर स्वर्ग दोन बोटे उरल्याप्रमाणे झाले.
कासवांची मिरवणूक निघाली ! आनंदाच्या
आरोळ्यांनी व जयघोषांनी सारे आकाश, दुमदुमून
गेले ! त्या आवाजाचे प्रतिध्वनी जवळच असलेल्या जंगलातील सशांच्या गावापर्यंत
पोहोचले !
'सशांचा धिक्कार असो ! कासवांचा जयजयकार
असो ! ह्या घोषणा सशांच्या कानांवर आता स्पष्टपणे येऊ लागल्या. त्याचा अर्थच
त्यांना समजेना. 'आमचा कोण धिक्कार करतो आहे ?' हा प्रश्न जो तो विचारू लागला. सशांच्या राजेसाहेबांच्या कानांवर ही बातमी
गेली. त्यांनी झाडून साऱ्यांना एके ठिकाणी पाचारण केले. स्वतःच्या धिक्काराची
बातमी ऐकून त्या सर्व सशांमध्ये एकच खळबळ माजून राहिली.
अशा वेळी एक ससा मात्र केविलवाणा चेहरा
करून एका कोपऱ्यात उभा होता. त्याचा चेहरा अगदी उदास दिसत होता. त्याच्या
डोळ्यांतून टपटप अश्रू गळत होते. आपले अश्रू त्याने पुसले आणि गर्दीतून वाट काढीत
तो थेट राजेसाहेबांच्या जवळ येऊन पोहोचला. त्याने राजेसाहेबांच्या पायांवर लोळण
घेतली व तो म्हणाला, “महाराज, मला क्षमा करा. या सान्या प्रकारास मीच कारणीभूत आहे. मीच चांडाळाने हा
अपमान सहन करण्याचा प्रसंग आपणांवर आणला आहे. माझ्या आळशीपणामुळे त्या दिवशी एका
कासवाने माझा पराभव केला. त्याच्याशी झालेल्या पळण्याच्या शर्यतीत मी हरलो. याच
माझ्या डोळ्यांवर त्या दिवशी झोप आल्यामुळे मी वाटेत झोपून राहिलो. ते हे दुष्ट
डोळे तुम्ही आत्ताच्या आत्ता फोडून टाका. महाराज, मी आनंदाने
ही शिक्षा भोगण्यास तयार आहे. "
सारा प्रकार राजेसाहेबांच्या लक्षात
येण्यास उशीर लागला नाही. सर्व सशांनाही झाल्या गोष्टीचा उमज पडला. राजेसाहेबांनी
त्या अपराधी सशाला धीर दिला. त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरविला. ते म्हणाले,
"बेटा, भिऊ नकोस ! त्या कासवांच्या
मूर्खपणाचे प्रायश्चित्त त्यांना लवकरच मिळेल.' कासवपुरीतील
कासवांच्या आनंदाचे कारण सशांना कळताच ते सर्व खो खो हसतच सुटले. सशांची सभा संपली
! सध्या काहीही न करता स्तब्ध बसून राहावे असे त्यांनी ठरवले.
कासवांचा अभिमान ताडासारखा वाढत चालला.
सशांची गाठ पडताच ते त्यांची हेटाळणी करू लागले! परस्परांतील हे वैर सारखे वाढतच
चालले. एकमेकांना ते जणू पाण्यात पाहू लागले. अखेरीस या बाबतीत काय तो सोक्षमोक्ष
करावा म्हणून सशांच्या राजेसाहेबांनी कासवांच्या राजेसाहेबांची मुलाखत घेतली.
“उगीच आपल्यातील वैर वाढवू नका.. " असे त्यांनी त्यांना विनवले. पण
कासवांच्या राजाचा ताठा व अभिमान कमी होण्याचे चिन्ह दिसेना.
"पुन्हा एकदा होऊ दया शर्यत आणि
पाहा काय घडते ते ? " कासवांचे राजे गर्वात म्हणाले.
सशांचे राजे म्हणाले. "ठीक आहे. पण
पश्चात्ताप करण्याची पाळी येईल हो शेवटी तुमच्यावर !" "आमच्या कासवाला
आली तशीच ना!" खोचकपणे कासवांचे राजे उद्गारले.
सशांचे राजे पुन्हा एकदा स्वतःशी हसले.
सशांची व कासवांची पळण्याची शर्यत पुन्हा
एकदा व्हावी असे ठरले.
त्यानंतर पंधरा दिवस कोण गडबड व धांदल
उडाली होती कासवपुरीत !
धावण्याच्या शर्यतीत भाग घेण्याकरिता बारा
कासवांची निवड केली होती. दमछाट होईपर्यंत पळण्याचा ते रोज सराव करत होते. सारी
कासवे त्यांना उत्तेजन देण्यास मोठ्या हिरिरीने भाग घेत होती. "पाहा,
आपलं नाव राखणं तुमच्या हाती आहे." असे ती त्यांना बजावून
सांगत होती.
सशांच्या गावात गडबड उडण्याचे काहीच कारण
नव्हते. कासवांच्या मूर्खपणाला सारे जण हसत होते. त्यांनीही बारा जणांची निवड करून
ठेवली होतीच. त्यांना पळण्याची सवय करण्याचे काहीच कारण नव्हते. आणि त्यांना कोणी
उत्तेजन देण्याचीदेखील जरुरी नव्हती. तरी पण काही म्हातारे ससे त्यांना मधून मधून
बजावतच,
"सांभाळा बरं का रे पोरांनो! नाहीतर बसाल टंगळ- मंगळ करीत
शर्यतीच्या वेळातच ! आधी आपल्या जागी पोहोचा आणि मग करा इतर काय करायचे ते!"
झाले! एकदाचा शर्यतीचा दिवस उगवला! कासवपुरी
व सशांचा गाव यांच्यामध्ये असलेल्या पटांगणात कासवांची व सशांची ही गर्दी झाली
होती ! मुंगीलादेखील शिरायला वाव मिळेना. बारा जणांची जोडीजोडीने शर्यत होणार
होती. प्रत्येक कासवाला आपणच जिंकू असा अभिमान वाटत होता. त्यांचा तो मूर्खपणा
पाहून ससे डोळे मिचकावत एकमेकांकडे हसत होते. पाहून मिस्कीलपणे
'धाड्! धाड् !! धाड् !!! शयंत सुरू झाली
! पळा! पळा !!" एकच ध्वनी सर्व आकाशात दुमदुमू लागला. 'अरे
ते गेले! गेले! पळा!' एकच हलकल्लोळ उडाला. सारी कासवे
डोळ्यांत साग जीव आणून शर्यतीकडे पाहू लागली. ओरडून ओरडून त्यांचे घसे कोरडे पडले.
पळणाऱ्यांपेक्षा उत्तेजन देणाऱ्यांचीच खरी धांदल उडाली. पळणा-यांची त्रेधातिरपीट
तर विचारा- यलाच नको! सशांच्या समुदायात आनंद व हास्य यांचे फवारे उडू लागले ! अरे पळा! पळा! कासवांच्या पुढे पळा!' असे ते ओरडू लागले. 'कासव शर्यतीत जिंकणार बुबा अं!' असे म्हणून ते
कासवांना हिणवू लागले. इतक्यात शर्यतीत भाग घेणारे सारे ससे ठराविक ठिकाणी पोचून
परत आले देखील.
त्यांना पाहताच साऱ्या कासवांचे डोळे
पांढरे झाले. त्यांच्या राजेसाहेबांचा चेहरा तर काळाठिक्कर पडला. कासवे हरली !
'कासवांचा जयजयकार असो! सशांचा धिक्कार असो !' खवचटपणे सारे ससे आरोळ्या मारू लागले. “जाऊ दया. मेलेल्यांना काय मारता " एक शहाणा ससा मोठ्याने म्हणाला आणि सर्व कासवे लाजेमुळे आपापले पाय व मान पोटात घेऊन बसून राहिली. त्यांना पाहताच ससे म्हणतात-
'कासवकाका, कासवकाका, पळण्याची शर्यत लावता काय? ... नको रे बाबा, शर्यत तुमची, आमचे आपले पोटात पाय! "
-रा. ना. झोळ
0 Comments