Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Marathi Katha-Marathi Story मराठी कथा मराठी गोष्टी | कथा - मोती

 मोती

आपण सतत मराठी कथा Marathi Katha मराठी कथा Marathi Story मराठी गोष्टी  वाचनीय लेख शोधत असता. आज आपण मराठी पाठ्यपुस्तकातील अतिशय भावनिक कथा पाहणार आहोत. मुलावर संस्कार व्हावेत यासाठी वाचनीय कथागोष्टीवाचनीय लेख वाचन करणे आवश्यक असते. 
Marathi-Katha मराठी-कथा Marathi-Story-moti

मोती 

लेखक- मधू मंगेश कर्णिक 

लेखक परिचय- मधू मंगेश कर्णिक (१९३३) यांची अनेक पुस्तके होत पुढील कथा त्यांच्या 'सोबत' या पुस्तकातून घेतलेली आहे. काही प्राण्यांचा आपल्याला इतका लळा लागतो की घरातल्या माणसांसारखे ते प्रिय होतात. पुढे दिलेल्या कथेतील 'मोती' हा असाच अगदी घरचा झाला आहे.

मोती आला आणि आमच्या काळ्या गाईला पाडी झाली. त्यापूर्वी त्या गाईला प्रत्येक वेळी गोऱ्हा झाला होता. त्यामुळे हा शुभशकुन आईच्या मते मोतीनेच घडवला होता. आणि वडिलांना तर मोतीचा फारच लळा लागला. थोड्याच दिवसांत मोती आमच्याशी घरातील मोठी माणसे वागत तसा वागू लागला. खरे तर त्याला आम्ही पोरांनीच लहानाचा मोठा केला होता. पण ते तो विसरला होता. आमच्या लपालपीत, आबाधुबीच्या खेळात भिडू होण्याचे त्याने नाकारले. त्याची बैठक पडवीत आमच्या वडिलांच्या समोर असे. वडील माच्यावर बसलेले असले, की जणू काही त्यांच्यावर संरक्षणाचा पहारा करण्यासाठी जागरूकपणे त्यांच्या पायांशी बसून राहायचा. त्यांनी 'मोत्या ऊठ, म्हटले की कान फडफडवीत उठायचा. 'मोत्या छू म्हटले, की त्यांनी हाताने दाखवलेल्या दिशेकडे बेछूट पळायचा. कुणाचे परके ढोर परड्यात येण्याची मोतीसमोर सोय नसे आणि कुणी परका माणूस अंगणात उभा राहिलेला त्याला सहन होत नसे. वडिलांनी 'मोत्या-चूप म्हटले, की ताबडतोब कान पाडून तो उगी राहायचा आणि त्या माणसाला त्याच्या आज्ञाधारकपणाचा विस्मय वाटायचा. अष्टौप्रहर मोती त्यांच्या अवतीभवती असायचा. घराबाहेर पडले, की ते कुठे जाणार हे तो बिनचूक ओळखायचा नि त्यांच्यापुढे चालत सुटायचा. ते ज्या घरी जाणार असतील त्या घरी त्यांच्या आधीच जाऊन धापा टाकत उभा राहायचा.

मोतीची घरातल्या सर्वांवर नजर असे. बाहेरून कोणी अनोळखी माणूस आला. की त्याच्या हालचालींवरही त्याचा सक्त डोळा असे. मोतीची नजर चुकवून अंगणात पडलेले फणसाचे वाळलेले पानही कुणी उचलू धजत नसे. एकदा रात्री वडील कशासाठी तरी अंगणापलीकडील मोकळ्या जागी चालले होते. मोती पाठोपाठ होताच. त्याला कसलीतरी शंका आली. तो जोरजोराने भुंकू लागला. वडिलांना तो एकही पाऊल टाकू देईना. भुंकत तो अंगणापलीकडच्या फणसाच्या बुंध्यापर्यंत जाई नि पुन्हा मागे वडिलांपाशी येऊन भुंके. आपल्या भाषेत काहीतरी सांगू लागे, वडलांनी त्याच्या मनातले ओळखले; घरात जाऊन त्यांनी कंदील आणला नि मोतीला घेऊन ते फणसापाशी उभे राहिले नि गोठ्यात गुरांना वैरण घालत असलेल्या गड्याला त्यांनी हाक मारली. त्याला काठी घेऊनच यायला सांगितले. गडी काठी घेऊन आला.

फणसाच्या बुंध्याशी एक भला मोठा अजगर आपले बेडकासारखे दिसणारे डोके पवित्र्यात उभारून तयार राहिला होता. कंदिलाला दिपून गेल्यामुळे त्याची हालचाल होत नव्हती.आणि वडलांनी एकामागोमाग एक प्रहार करून त्या अजगराला ठार केले आणि मगच मोतीचा आरडाओरडा बंद झाला.

मोती शिकारीच्या कामात वाकबगार होता. वडील बंदूक खांद्यावर घेऊन बाहेर पडले म्हणजे त्यांच्यापुढे एक पाऊल त्याचे पडे. ससा निघाला म्हणजे मोतीची उडी सशापुढे एक वाव अधिक पडायची. पण हा शिकारी बाणाच एकदा त्याच्या जिवावर बेतला होता.

 

गावात भिकान्यांचा तळ पडला नि ते लोक शिकारीला बाहेर पडले. कधी परक्या माणसाबरोबर बाहेर न जाणारा मोती त्या दिवशी नेमका त्यांच्याबरोबर रानात शिरला. मोतीने रानात गेल्यागेल्याच दोन ससे मारून दिले. शिकारीच्या खेळातील मोतीची कर्तबगारी भिकाऱ्यांच्या नजरेत भरली. त्यांनी मोतीला पळवण्याचा घाट घातला. रात्री त्याला त्यांनी त्यांच्या तळावर बांधून ठेवले नि पहाटे गाव जागा व्हायच्या आत मोतीला बरोबर घेऊन त्यांनी तळ उठवला. मोतीला साखळी बांधून त्यांनी आपल्याबरोबर बळजबरीने नेले. "रात्री मोती घरी आला नाही तशी शोधाशोध सुरू झाली. घरातले एखादे माणूसच घरी परतू नये तसे वाटून सगळीकडे चौकशी सुरू झाली. मोतीला गावाबाहेर भिकाऱ्यांनी डांबून ठेवले असेल, ही शंकाच कुणाला आली नाही.

त्या रात्री कुणी जेवले नाही. मोती कुठे गेला असेल, याची काळजी करत नित्याच्या आठवणी काढत त्या रात्री किती वेळपर्यंत तरी आम्ही जागत बसलो होतो.

मोती दुसऱ्या दिवशी आला नाही नि तिसऱ्या दिवशीही त्याचा तपास लागेना. मोतीसाठी वडिलांनी पाचदहा गावे पालथी घातली; पण शोध लागेना. शेवटी आता नाती आपणांस कायमचा अंतरला असे समजून सगळे घर दु:खी- कष्टी झाले.

यावर एकदोन नव्हे तर चांगली तीन वर्षे गेली. मोती एके दिवशी अकस्मात येऊन दाखल झाला! प्रथम त्याला कोणी ओळखलेच नाही. ओळखणार कसे ? त्याचे कान छाटले होते, शेपटी छाटली होती, पाठीवर लोखंड तापवून डागल्याच्या काळ्याकुट्ट खुणा होत्या. त्याचा पूर्वीचा सारा दिमाख पार नाहीसा झाला होता. दुष्काळातून तोंड घेऊन आलेल्या एखादया जनावरासारखा तो हडकलेला कुत्रा आमच्या घरात ओळखीच्या माणसासारखा शिरलेला पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. मोती घरात आला नि सगळीकडे भराभर हिंडला. सगळ्यांना तो प्रेमभराने चाटू लागला; तरी कुणी त्याला ओळखू शकले नाही. तसा तो शहाणा कुत्रा दुःखीकष्टी झाला. आपल्याला या घरात कोणी ओळखले नाही, हे त्याला कळून चुकले. निरुपाय होऊन त्याच्या काळ्याभोर डोळ्यांतून आसवे ओघळू लागली. तोच वडील बाहेरून आले. त्यांना पाहताच तो आवेगाने पुढे झाला नि त्यांच्या छातीवर दोन्ही पाय ठेवून तोंडातल्या तोंडात कुईकुई आवाज करू लागला. आपली भुंडी शेपटी हलवू लागला. वडिलांच्या अंगाला चाटू लागला. जणू तो विचारत होता, "अरे, मला परक्यासारखं का वागवता ? मला अद्याप कसं कोणी ओळखलं नाही ? "

वडिलांनी त्याच्याकडे नीट पाहिले नि क्षणार्धात त्याला ओळखले. त्याच्या गळ्याला मिठी मारत ते म्हणाले, “पोरांनो! अरे, हा आपला मोती ! मोतीला मध्ये ठेवून आम्ही सर्वांनी आनंदाने त्याच्याभोवती उड्या मारल्या.

आमची बहीण तर मोतीच्या गळ्याला घट्ट मिठी मारून बसली. न जाणो पुन्हा नाहीसा झाला तर मोती आला नि पाठोपाठ भिकारी शोध करीत आले. आमचा कुत्रा आला आहे का असे विचारू लागले. भिकाऱ्यांची चाहूल लागताच मोती घाबरला आणि माजघरातल्या कोपऱ्यात दडून बसला. तो वाघासारखा कुत्रा पण भीतीने थरथर कापू लागला. त्याची ती अवस्था वडिलांनी पाहिली नि ते बाहेर उभ्या राहिलेल्या भिकाऱ्यांना म्हणाले, "आता बऱ्या बोलानं गाव सोडता, की हवं चौदावं रत्न ? माझा तरणाबांड कुत्रा पळवून त्याची दशा दशा लावलीत तुम्ही ! जख्खड म्हातारा झाला माझा कुत्रा. आता त्याची आशा धरलीत तर पुन्हा घाटावरून उतरू देणार नाही, याद राखा. "

वडिलांची ती धिप्पाड मूर्ती आणि रागीट चेहरा बघून ते भिकारी घाबरले व निघून गेले. पण त्यांचा तळ गावातून बाहेर पडेपर्यंत मोती माजघरातून बाहेर पडत नव्हता. भिकाऱ्यांनी त्याचे अतिशय हाल केले होते आणि मोतीने त्यांची हाय खाल्ली होती.

मोती आता म्हातारा झाला होता. आता त्याच्याने पूर्वीसारखे धावणे होत नव्हते. त्याची पूर्वीची ताकद त्या तीन वर्षांच्या वनवासात नाहीशी झाली होती. तो आपला रात्रंदिवस पडवीत बसून राही. कधी-कधी लहर लागली तर वडिलांबरोबर बाहेर पडे.

दरवर्षी श्रावणात 'हरिविजय' किंवा 'पांडवप्रताप 'यासारखी पोथी वडील रात्री वाचत. सगळे गावकरी ती ऐकायला गोळा होत. वडिलांनी पोथी वाचायला सुरुवात केली, की मोती जिथे असेल, तिथून धावत यायचा नि वडिलांसमोर एखादया भाविक श्रोत्यासारखा बसून राहायचा. पोथी वाचून पूर्ण होईपर्यंत तो बसल्या जागेवरून उठत नसे; वर तोंड करून तो नुसता ऐकत राहायचा. त्याला काय समजे कुणास ठाऊक, पण त्याचे हे पोथी ऐकणे मोठे अपूर्वाईचे वाटे. गावात सगळे जण त्याची चर्चा करत. असा होता आमचा मोती !





Post a Comment

0 Comments