Marathi Short Story Marathi Katha मराठी कथा Marathi Story मराठी गोष्टी ते बाबा कोण?
ते बाबा कोण?
चंपारण्यातील ही गोष्ट!
त्या वर्षी तेथे
पाऊस पडला नाही; त्यामुळे पिके सुकली. कुरणे करपली.
गुराढोरांना चारा मिळेनासा झाला. शेतकरी चिंतेत पडले. आकाशाकडे पाहून पाहून
त्यांचे डोळे पांढरेफटक झाले. ते देवाची प्रार्थना करू लागले.
एके दिवशी तेथे
एक मांत्रिक आला. त्याने आपल्या पोथ्या चाळल्या आणि शेतकऱ्यांना सांगितले,
"तुमच्यावर देवी कोपली आहे. तिला संतुष्ट केल्याशिवाय पाऊस
पडणार नाही. शेती पिकणार नाही. त्यासाठी देवीला एक बोकड बळी दया. देवी संतुष्ट
होईल. सगळीकडे पाऊस पडेल. दुष्काळाचा सुकाळ होईल. तुमचं दुःख संपेल. तुम्ही सुखी
व्हाल."
शेतकरी अज्ञानी
होते. संकटात होते. त्यामुळे त्यांना वाटले, मांत्रिकाच्या
रूपाने देवच आपल्या मदतीला धावून आला आहे. त्यांनी मांत्रिकाच्या शब्दांवर विश्वास
ठेवला. देवीला बोकड बळी दयायचे ठरले !
त्यांनी एक बोकड आणला. त्याला रंग फासला. शिंगांना रंगीबेरंगी कागद लावले. गळ्यात फुलांच्या माळा घातल्या. कपाळाला गुलाल लावला. मोठी मिरवणूक निघाली. सर्वांच्या पुढे सजवलेला बोकड होता. त्याच्यामागे बैलांच्या जोड्या व माणसांच्या रांगा चालत होत्या. बँडबाजा वाजवत, ढोल बडवत मिरवणूक मुख्य रस्त्याने जात होती.
त्याच रस्त्याने
एक बाबा काठी टेकत येत होते. त्यांच्या अंगावर दोनच वस्त्रे होती. एक पंचा ते
नेसले होते आणि एक पंचा त्यांनी अंगाभोवती लपेटला होता. एवढी मोठी मिरवणूक कशाची
म्हणून बाबा थांबले. त्यांनी एका शेतकऱ्याला जवळ बोलावले.
आणि विचारले,
"ही मिरवणूक कसली?
"अहो, बाबा!
तुम्ही गावात राहता की जंगलात ? तुम्हांला ठाऊक नाही ?
अहो, आपल्या गावावर देवीचा कोप झाला आहे;
म्हणून यंदा पाऊस पडला नाही. देवीला संतुष्ट करायचं आहे. त्यासाठीच
ही मिरवणूक आहे. तो सजवलेला बोकड आहे ना! देवीला त्याचा बळी द्यायचं ठरलं
आहे." शेतकरी मोठ्या आनंदाने म्हणाला.
'देवीला बोकड बळी दिल्यानं पाऊस पडेल
काय?" त्या बाबांनी विचारले. "होय," शेतकरी म्हणाला.
"बोकडाचा बळी दिल्यानं दुष्काळाचा
सुकाळ होईल काय? "
'होय'
"बोकड श्रेष्ठ, की माणूस श्रेष्ठ?" त्या बाबांनी प्रश्न केला.
"केव्हाही माणूस श्रेष्ठ. पण का हो
बाबा! तुम्हांला त्याच्याशी काय करायचं? तुमचं काम तुम्ही
करा. आमचं काम आम्ही करतो. शेतकरी काहीसा त्रासून बोलला.
"बोकडापेक्षा माणूस श्रेष्ठ ना?
मग असं करा. तुमच्या त्या देवीला बोकडाचा बळी देऊन जर पाऊस पडत असेल,
दुष्काळाचा सुकाळ होत असेल, हजारो लोकांचे
प्राण वाचत असतील, तर देवीला बोकडाऐवजी माझा बळी दया. "
असे म्हणून झटकन मिरवणुकीच्या पुढे झाले. लोकांना आश्चर्याचा धक्का बसला.. ते बाबा
त्यांचे हे उद्गार ऐकून सर्वांना त्या
बाबांच्या मोठ्या मनाची ओळख पटली. सर्वांनी बाबांना मनापासून नमस्कार केला आणि
बोकडाला सोडून दिले.
ओळखा पाहू. हे बाबा कोण?
ते होते आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी.
लेखक- राम काळे
0 Comments